19/08/2019
#खेडच्या #पश्चिम #पट्ट्यातील #निसर्ग #पर्यटन
#भोरगीरी - खेड तालुक्यातील महाबळेश्वर.
#भीमाशंकर - प्राचीन महादेव मंदिर, बारावे ज्योतिर्लिंग.
निसर्ग सौंदर्याची मूक्त उधळण अनुभवण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक हखेड तालुक्याच्या पश्चिम भागात फिरताना दिसतात. सह्याद्रीच्या डोंगर रांगांतून भौगोलिक, धार्मिक, कृषि तसेच नैसर्गिक पर्यटनाचा पुरेपूर आनंद पर्यटक सध्या घेतानाचे चित्र पाहायला मिळत आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील राजगुरुनगर - भिमाशंकर मार्गावर डेहणे - भोरगिरी, आदी ठिकाणाहून पर्यटन स्थळाकडे जाताना प्रथमतः चास गाव लागते. गावाच्या बाजूने भीमा नदी वाहते आहे. या भीमा नदीच्या प्रवाह मार्गात बेसाल्ट खडकापासून तयार झालेले मोठमोठे रांजणखळगे पहावयास मिळतात. तसेच याच गावात थोरले बाजीराव पेशवे यांची धर्म पत्नी काशीबाई यांनी भिमा नदी काठी बांधलेले सोमेश्वर मंदिर, त्या पुढे असलेली सुप्रसिद्ध दिपमाळ, पुरातन काळातील लक्ष्मी विष्णू मंदिर, कुंडमाऊली मंदिर, पहावयास मिळते.
चास गावापासून पुढे गेल्या नंतर कडधे गाव आहे. या ठिकाणी श्री. खंडेरायाचे भव्य मंदिर आहे. थोडे पुढे गेल्यानंतर चासकमान धरणाची मातीची भिंत दिसू लागते. चासकमान धरणाचा विशाल व दूरपर्यंत पसरलेला पाणी साठा पर्यटकांची मने जिकून घेतो. पर्यटक या ठिकाणी थांबून थंड-गार वारा, धरणाच्या उसळणा-या लाटांचे तुषार अंगावर घेण्यासाठी धरणाच्या काठावर फेरफटका मारताना दिसतात.
धरणापासून सह्याद्री डोंगर रांगांच्या नागमोडी रस्त्याने डोंगर कुशीत वसलेल्या वाड्या, वस्त्या मागे टाकत - टाकत प्रवास पुढे - पुढे जात राहतो. बुरसेवाडी नंतर डोंगर पायथ्याशी ठाकरवाडी लागते. याच पायथ्यापासून शंभो महादेव मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट आहे. पायथ्यापासून साधारणपणे पाचशे-सहाशे मीटर उंचीवर शंभो महादेव मंदिर आहे. शंभो महादेव परिसरातील शांतता विलोभनीय आहे. या उंच ठिकाणाहून डोंगररांगांच्या आजूबाजूचा विलोभनीय परिसर, धरणातील पाणीसाठा अधिकच आकर्षक दिसतो.
पुढे गेल्यानंतर चासकमान धरणात बुडालेले पुनर्वसित वाडा गाव आहे. वाडा ही खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शनिवारी गावाचा आठवडी बाजार भरतो. भाजीपाला, किराणा बाजार, कपडे, इलेक्ट्रोनिक साहित्य, दवाखाना, औषधे, शेती बी-बियाणे, खते, भांडी, माध्यमिक व उच्च माध्य. शिक्षण सुविधा, शालेय साहित्य, बांधकाम साहित्य, शेती अवजारे, पेट्रोल पंप, बँक, पोस्ट सुविधा, ई-सुविधा, लग्न बस्ता, इत्यादी अनेक बाबींसाठी पश्चिम भागातील लोकांसाठी वाडा बाजारपेठ महत्वाची आहे. गणपती, बैलपोळा, दिवाळी, या सारख्या सणा - वारांना ही बाजारपेठ विक्रेते व ग्राहकांनी फुललेली असते.
वाडा या गावच्या उत्तर बाजूस उंच डोंगरावर गडदुदेवीचे भव्य जागृत देवस्थान आहे. देवीचे संपूर्ण मंदिर कातळाच्या भव्य गडदात आहे. मंदिरावरील उंच डोगरावरून मंदिराच्या समोर कोसळणारा नयनरम्य धबधबा येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांची मने जिंकून घेतो. देवीच्या दर्शनासाठी आलेले भाविक या ठिकाणच्या शांततामय, सात्विक व नयनरम्य वातावरणात आपला वेळ व्यतीत करतात. सह-कुटुंब वन भोजनाचा आनंदही पर्यटक घेतात.
वाडा गावापासून वळणा-वळणाच्या रस्त्याने आव्हाट, शिरगाव, मंदोशी, डेहेणे, भोरगिरी, आदी ठिकाणी गेल्या नंतर धबधब्याची खरी जणू मालीकाच सुरु होते. याच परिसरात उंच - उंच सह्याद्रीच्या डोंगर रांगावरुन कोसळणारे छोटे - मोठे धबधबे पर्यटकांना पहावयास मिळतात. भोरगिरी परिसरातील शिरगाव येथील उंच नेकलेस धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो आहे.
गुप्त भीमाशंकर कडे जाणारे भाविक भोरागिरी गावाहून पायी प्रवास करताना दिसतात. येथील मनमोहक धबधबे, काटेश्वर मंदिर, भोरगड पर्यटकांचे आकर्षण आहे. भोरगीरी ते भीमाशंकर ट्रॅकींगसाठी तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात येतात. काही भाविक पर्यटक भोरगीरी ते भिंमाशंकर पायी जाऊन दर्शन घेतात.
वाडा - डेहणे या मार्गावरील मंदोशी घाट मार्गे प्रवास करून तळेघर व पुढे भीमाशंकर या तीर्थ क्षेत्रावर लवकर पोहोचता येते.
चासकमान धरण, वाडा, डेहेणे, भोरगिरी, भिमाशंकर, परिसरातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी व्यापलेला रम्य निसर्ग, दाट वृक्षाची वर्दळ, उंच उंच डोंगरावरुन कोसळणारे धबधबे, अशी निसर्ग सौंदर्याची उधळण या परिसरामध्ये पहावयास मिळते. सह्याद्रीच्या या डोंगर रांगांत कोळी महादेव, ठाकर, कातकरी या आदिवासी जमातींचे वास्तव्य आहे.
निसर्गरम्य असे कळमोडी धरण पाहण्यासारखे आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात पहिले धरण म्हणून कळमोडीची ख्याती आहे. कळमोडी धरणाचा ओव्हरफ्लो चासकमान धरणात येतो. अर्नाळा नदी आणि भीमा नदीचा संगम या ठिकाणी आहे. परिसरातील भामा-आसखेड धरण सुद्धा पाहण्या सारखे आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत रानमेव्याचा (करवंदे, तोरणे, आंभेळी, जांभळे, आवळे, गावरान आंबे इ.) आस्वाद घेण्यासाठी पर्यटक या भागात आवर्जून येतात. त्याचप्रमाणे पावसाच्या दिवसातही या भागातील निसर्ग सौंदर्याच्या मनोहारी आठवणी जपण्यासाठी पर्यटक भ्रमंती करताना दिसतात.....