आमचं कल्याण - Aamcha Kalyan

आमचं कल्याण - Aamcha Kalyan कल्याण शहरातील चालू घडामोडी, पाहण्यासारखी ठिकाणे याविषयी माहिती Info & current affairs of Kalyan

टिटवाळ्यात ‘निसर्गायण’ – पर्यावरण संवर्धनाचा नवउमेद उपक्रमजागतिक पर्यावरण दिनानिमित्त टिटवाळ्याजवळील रुंदी या ठिकाणी पर्...
05/06/2025

टिटवाळ्यात ‘निसर्गायण’ – पर्यावरण संवर्धनाचा नवउमेद उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टिटवाळ्याजवळील रुंदी या ठिकाणी पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने ‘निसर्गायण प्रकल्प’ राबवला जात आहे. या उपक्रमात १२ एकर भूखंडावर ५,००० झाडांची लागवड करून एक समृद्ध वनराई साकारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

यातील ४ एकर जागेत १,६०० झाडांची लागवड येत्या ८ जून रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत होणार आहे. उर्वरित झाडे आजूबाजूच्या परिसरात टप्प्याटप्प्याने लावली जातील. संपूर्ण वृक्षारोपण २०२४-२५ या वर्षात पूर्ण करण्याचा मानस असून, लावलेल्या झाडांची निगा राखण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.

विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, शाळा, संस्था व विद्यार्थ्यांच्या सहभागातून पार पाडला जाणार आहे. कार्यक्रमात ‘माती, पाणी आणि जैवविविधता’ या विषयांवर जनजागृती करण्यात येणार असून, पर्यावरण भान जागवण्यासाठी निसर्गभ्रमंतीचे आयोजनही केले गेले आहे.

हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून, हरित क्षेत्र वाढवणे आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक प्रभावी पाऊल आहे.

दोन दशकांहून अधिक कार्यशील संस्था

पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था २५ वर्षांपासून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात पर्यावरण शिक्षण व संरक्षणासाठी कार्यरत आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज लक्षात घेऊन संस्थेचा भर सामूहिक सहभागातून पर्यावरण जागृती आणि रक्षण करण्यावर आहे.

कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, निसर्गायणसारखे उपक्रम भविष्यासाठी हरित श्वास घेण्याचे आश्वासन देणारे ठरतील.

कल्याणमध्ये वसार व नांदिवली परिसरातील ४० बेकायदा चाळींवर महापालिकेची कारवाईपावसाच्या प्रतिकूल हवामानातही कडक अंमलबजावणी;...
28/05/2025

कल्याणमध्ये वसार व नांदिवली परिसरातील ४० बेकायदा चाळींवर महापालिकेची कारवाई

पावसाच्या प्रतिकूल हवामानातही कडक अंमलबजावणी; भूमाफियांना धक्का

कल्याण, दि. __ : कल्याण पूर्वेतील वसार व नांदिवली तर्फ भागात उभारण्यात आलेल्या सुमारे ४० बेकायदा चाळींवर आणि २० हून अधिक नव्या जोत्यांवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 'आय' प्रभाग प्रशासनाने कठोर कारवाई करत ती जमीनदोस्त केली. विशेष म्हणजे ही संपूर्ण मोहीम मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्ताच्या सहाय्याने राबविण्यात आली.

गेल्या काही आठवड्यांत भूमाफियांकडून वसार व नांदिवली परिसरातील मोकळ्या भूखंडांवर अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू होती. प्रारंभी ही कामे महापालिकेच्या नजरेंतून दूर राहिली, मात्र प्रभाग सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी क्षेत्रीय पाहणी दरम्यान सदर बेकायदा बांधकामांची दखल घेत त्वरित कारवाईचे आदेश दिले.

कारवाईदरम्यान कोणीही नागरिक वा संबंधित बांधकाम व्यावसायिक पुढे येऊन माहिती देण्यास तयार झाले नाही. मात्र, तपासणीत या बांधकामांचे कोणतेही अधिकृत परवाने वा मंजुरी नसल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने कठोर पवित्रा घेत तोडकाम सुरू केला.

यासंदर्भात सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी सांगितले की, "प्रभागात बेकायदा चाळी, प्रदूषणकारी कारखाने वा कोणतेही अनधिकृत बांधकाम यांना स्थान दिले जाणार नाही. महापालिकेने यासाठी स्पष्ट धोरण आखले असून, आवश्यक ती कारवाई सातत्याने केली जात आहे."

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी देखील प्रभागातील अतिधोकादायक इमारतींची पाहणी, नाले व गटार सफाई तसेच पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार प्रभागातील सर्व सहाय्यक आयुक्त संबंधित परिसराची पाहणी करत असून, वसार व नांदिवलीमधील बेकायदा चाळी तत्काळ हटविण्यात आल्या.

ही कारवाई कोणत्याही प्रतिकाराशिवाय पार पडल्यामुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण असून, महापालिकेच्या या ठाम भूमिकेचे कौतुक केले जात आहे. भविष्यातही बेकायदा बांधकामास कुठलाही पायपोस न ठेवता कठोर भूमिका घेतली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या सहकारी उपनिबंधकाची होणार उच्चस्तरीय चौकशीशासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या सहकारी उप...
26/05/2025

शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या सहकारी उपनिबंधकाची होणार उच्चस्तरीय चौकशी

शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या सहकारी उपनिबंधकाची होणार उच्चस्तरीय चौकशी

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या मागणीला यश

स्थानिक विकासकाच्या फायद्यासाठी विकासकाच्या संगनमताने मुद्रांक शुल्कामध्ये राज्य शासनाचे कोट्यवधीचे नुकसान करणाऱ्या मागाठणे 17 येथील सहकारी उपनिबंधकाच्या चौकशीचे आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. याप्रकरणात भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. त्याची राज्याच्या महसूल मंत्र्यांनी गंभीर दखल घेत नोंदणी आणि मुद्रांक नियंत्रक महानिरीक्षकांना चौकशी करून 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती नरेंद्र पवार यांनी दिली आहे.

मुंबईतील मागाठाणे 17 येथील उपनिबंधक अधिकारी संजय साळवे हे याठिकाणी गेल्या दीड वर्षांपासून कार्यरत आहेत. एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेची नोंदणी करायची असेल तर उपनिबंधाकडे अर्ज करावा लागतो. मग उपनिबंधक कागदपत्रांची पूर्तता करून मालमत्तेचे नोंदणीपत्र देतात. आणि त्यासाठी शासनाने ठरवलेल्याप्रमाणे लागणारे शुल्क घेतात. मग त्याप्रमाणे शासनाला महसूल उत्पन्न होत असतो. परंतु गेल्या दीड वर्षांपासून संजय साळवे यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून स्वतःच्या आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणाऱ्या विकासक - सामान्य नागरिकांच्या फायद्यासाठी शासनाला मिळणारा मुद्रांक शुल्क यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान करत असल्याची

तक्रार माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती. तसेच या दस्तऐवज मूल्यांकनामध्ये घोळ घोळ करून केंद्र आणि महाराष्ट्र शासनास दिल्या जाणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये तफावत दाखवून कागदपत्रांच्या नोंदणीसाठी येणाऱ्या गरजू व्यक्तींकडून पैसे उकळत असल्याचेही निदर्शनास आल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून पुराव्यासाठी त्यांनी दस्त नोंदणी क्रमांक.२३८६, दिनांक.१४/२/२०२५ ही या तक्रारीसोबत सादर केला आहे.

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत उच्चस्तरीय चौकशी करून मुद्रांक शुल्काचे उल्लंघन करणाऱ्या उपनिबंधक अधिकारी संजय साळवे यांची सखोल चौकशी करावी. आणि शासनास मुंद्रांक शुल्कात झालेले कोट्यवधींचे नुकसान या अधिकाऱ्याकडून वसूल करण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती.

त्यावर या गंभीर प्रश्नी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तातडीने दखल घेत नोंदणी आणि मुद्रांक नियंत्रक महानिरीक्षकांना याप्रकरणी चौकशी करून 7 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहितीही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे.

कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात, डंपर कठडा तोडून नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यूभरधाव वेगात असलेल्या हायवा ट्रकने...
20/05/2025

कल्याणच्या गांधारी पुलावर भीषण अपघात, डंपर कठडा तोडून नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू

भरधाव वेगात असलेल्या हायवा ट्रकने रिक्षाला जबर धडक दिली. धडकेनंतर ट्रकने पुलाचे कठडे तोडले आणि तो थेट उल्हास नदीत कोसळला. या अपघातात रिक्षामधील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सुरुवातीला ट्रकचा चालक आणि त्याच्यासोबत असलेली एक व्यक्ती ट्रकमध्ये अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, नंतर समोर आलेल्या माहितीनुसार ट्रक चालक सुखरूप असून तो पोलिसांच्या (Police) ताब्यात आहे. दरम्यान, अपघातानंतर गांधारी पुलावर हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या अवस्थेत मुलगा आपल्या आईसाठी आर्त हाक देत होता.

दुभाजकावर चढला डंपर; कल्याण पूर्वेमध्ये थरारक प्रकार, लागोपाठ दुसऱ्या दिवशी अपघात सत्रउताराचा भाग समतोल करण्याची स्थानिक...
16/05/2025

दुभाजकावर चढला डंपर; कल्याण पूर्वेमध्ये थरारक प्रकार, लागोपाठ दुसऱ्या दिवशी अपघात सत्र

उताराचा भाग समतोल करण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी

कल्याण पूर्वेकडील सर्वाधिक वर्दळीच्या काटेमानिवली परिसरातील उतारावर बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी दोन डंपर रस्ता दुभाजकला धडकले असल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.

महिन्यातून दोन ते तीन वेळा काटेमानिवलीच्या उतारावर विजयनगर भागात असे अपघात होत असल्याने हा उताराचा भाग समतोल करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

काटेमानिवलीचा भाग हा उंच टेकडी सदृश्य आहे. टेकडीचा काही भाग समतल करून या भागात रस्ता तयार करण्यात आला आहे. या टेकडीचा भाग उताराचा असल्याने आहे त्या उतारावरून रस्ता बांधण्यात आला. त्यामुळे काटेमानिवली विजयनगर भागात रस्त्याला उभा चढाव आणि खोल उतार आहेत.

या रस्त्यावरून अवजड वाहन उतरताना चालकाला अतिशय काटेकोरपणे वाहन उतरावे लागते. वाहन उतरत असताना ब्रेक निकामी झाला तर वाहन उतारावरून घरंगळत समोरील दुकाने, दुभाजकला धडकते. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत असे प्रकार सलग तीनदा घडले आहेत.

मंगळवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाची कचरावाहू गाडी या भागातील रस्ता दुभाजकाला धडकली होती. सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झाले नाही. ही घटना ताजी असतानाच बुधवारी सकाळी एक अवजड डंपर उतारावरून उतरत असताना रस्ता दुभाजकाला धडकला.

ब्रेक निकामी झाल्याने चालकाने थेट रस्ता दुभाजकाला धडक देऊन आपली बाजू सुरक्षित करून जीवित हानी टाळली. तथापी एखाद्या चालकाला हे शक्य झाले नाही तर मोठी जीवित हानी होऊ शकते. हा रस्ता पादचारी, व्यापारी, शाळकरी मुले, पालकांनी नेहमीच गजबजलेला असतो, असे स्थानिकांनी सांगितले. दोन महिन्यापूर्वी याच उतारावरील एक टेम्पो बाजुच्या दुकानात घुसला होता. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाला होता.

काटेमानिवली परिसरातील उताराचा रस्ता समतोल करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि या भागात दररोज होणारे अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केले आहे.

केडीएमसीच्या ड कार्यालयासमोरील उताराचा भाग कमी करून तेथे समतोल रस्ता तयार करण्यात यावा, यासाठी आपण केडीएमसीकडे पाठपुरावा करणार आहोत, असे शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी सांगितले.

जीवित हानी टाळण्यासाठी या अपघातग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी. या भागातील उंचवटा भाग काढून टाकण्यात यावा, यासाठी आपणही केडीएमसीच्या आयुक्तांना पत्र देणार असल्याचे या भागाच्या माजी नगरसेविका माधुरी काळे यांनी सांगितले.

🙏😔अत्यंत दुःखद 😔🙏भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते,श्री दिनेशजी तावडे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.ईश्वर त्यांच्या पवि...
16/05/2025

🙏😔अत्यंत दुःखद 😔🙏

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते,
श्री दिनेशजी तावडे यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती देवो..!

🙏🏼🌼ओम शांती🌼🙏🏼

शोकाकुळ - भारतीय जनता पार्टी,कल्याण

जन सामन्यातला कार्यकर्ता आणि नेता.
कोणालाही मदत करायला धाऊन जाणारा. परिषदेचा खंदा पाठीराखा.
त्याने भाजपचे पूर्णवेळ पण काही वर्षे काम केलं आहे हे अनेकांना माहित नसेल.
ओम शांती! ओम शांती!!
🙏🙏🙏🙏💐💐💐💐

मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर KDMC चा हातोडा, कारवाईदरम्यान कल्याणमध्ये तणावKalyan news in marathi : कल्याणमधील रहेजा परि...
12/05/2025

मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर KDMC चा हातोडा, कारवाईदरम्यान कल्याणमध्ये तणाव

Kalyan news in marathi : कल्याणमधील रहेजा परिसरात सत्यम इमारतीमधील मदरशाचे अनधिकृत बांधकाम कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेकडून तोडण्यात आले आहे. बेकायदेशीरपणे मदरसा बांधल्याने कारवाई करण्यात आली आहे.

कल्याण पश्चिमेकडील रहेजा कॉम्प्लेक्स या परिसरात सत्यम इमारतीमधील मदरशाचे अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार एका महिला डॉक्टरकडून करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण डोबिंवली महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तामध्ये मदरसाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील रहेजा कॉम्प्लेक्समधील एका इमारतीमध्ये मदरसाचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. एका रहिवाशी इमारतीच्या तळमजल्यावर हा मदरसा इमारतीच्या बांधकामात बदल करुन उभारण्यात आला होता. या संदर्भात केडीएमसीकडे एका महिला डॉक्टरने केली होती.

तक्रारीनंतर कल्याण डोबिंवली महानगरपालिकेकडून तोडक कारवाईला सुरुवात करण्यात आली. मदरश्यावरील कारवाई दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही स्थानिक रहिवाश्यांनी अधिकाऱ्यांना बांधकाम पाडल्यासंदर्भात जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत केले.

कल्याणमधील रहेजा परिसरात बेकायदेशीर पद्धतीने मदरशाचे बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामाच्या विरोधात तक्रार केल्यानंतर कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत जमीनदोस्त केले. कारवाईदरम्यान काही वेळा तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ठाणे मसाला बाजारातील सात गिरण्या सील, ठाणे महापालिकेची मोठी कारवाईया गिरण्यांसाठी बनविण्यात आलेल्या मोठ्या यंत्रांमुळे ध...
04/05/2025

ठाणे मसाला बाजारातील सात गिरण्या सील, ठाणे महापालिकेची मोठी कारवाई

या गिरण्यांसाठी बनविण्यात आलेल्या मोठ्या यंत्रांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून येत होत्या. या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे बाजारपेठेतील महात्मा फुले मंडईमधील मसाला बाजारातील सात मसाला गिरण्या ठाणे महाालिकेने सील केल्या आहेत. या गिरण्यांसाठी बनविण्यात आलेल्या मोठ्या यंत्रांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून येत होत्या. या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे बाजारपेठेत महात्मा फुले मंडईमध्ये मसाला बाजार आहे. ठाणे तसेच विविध भागातून या मसाला बाजारात नागरिक मसाला खरेदी करण्यासाठी येत असतात. या बाजारात मोठ्याप्रमाणात मसाला गिरण्या सुरु असतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असते. याबाबत स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार, परिमंडळ उपायुक्त शंकर पाटोळे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, साहाय्यक आयुक्त (स्थावर विभाग) राजेश सोनावणे, नौपाडा प्रभाग समितीचे साहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांनी या मसाला गिरण्यांची पाहणी केली.

या गिरण्यांमध्ये मोठी यंत्र-सामुग्री असल्याने या गिरण्या मंडईऐवजी औद्योगिक क्षेत्रात असायला हव्यात. या यंत्रांमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत होते. सुमारे १०० डेसिबलपर्यंत ध्वनीपातळी येथे नोंदवण्यात आली.

त्यांना मार्च महिन्यामध्ये ध्वनी प्रदूषणाबाबतची नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही या गिरण्या सुरूच होत्या. त्यामुळे ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे पालन करत नसल्याने त्या सील करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.

सहजानंद चौकात फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोगमहिन्याभराच्या अभ्यासानंतर बसवण्यात येणार कायमस्वरूपी सिग्नलयंत्रणाकल्याण द...
18/04/2025

सहजानंद चौकात फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग

महिन्याभराच्या अभ्यासानंतर बसवण्यात येणार कायमस्वरूपी सिग्नल
यंत्रणा

कल्याण दि. 17 एप्रिल :

अंतर्गत रस्ते असो की मुख्य, कल्याण आणि डोंबिवलीकरांसाठी वाहतूक कोंडीची समस्या काही नविन नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमेतील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये केडीएमसी आणि वाहतूक पोलीस प्रशासनातर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग करण्यात येत आहे. सहजानंद चौकात असलेले 5 रस्त्यांचा विचार करता याठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून केडीएमसीतर्फे याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड हा प्रमुख मार्ग असून दररोज याठिकाणाहून हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. या मार्गावरील दुर्गाडी चौक, लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बैल बाजार आदी प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रणाचे मोठे जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यातही सहजानंद चौकात तर एकाच वेळी पाच ठिकाणांहून वाहनांची ये जा असल्याने इथल्या वाहतुकीचे नियोजन करताना शहर वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.

या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता ही सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास पालिकेचा पैसा वाया जाऊ शकतो. शहरातील नागरिकांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.

पुढील 1 महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदींचा विचारही केला जाणार आहे. आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे. अशाच प्रकारची सिग्नल यंत्रणा नागपूर शहरात सुरू असून त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या चौकात सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी आपण प्रयत्नशील माजी सभागृह नेते श्रेयस समेळ

सहजानंद चौक हा कल्याणातील एक महत्त्वाचा चौक आहे. याठिकाणी सिग्नल यंत्रणा असावी यातही आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील होतो. त्या कामाला आता सुरुवात झाली आहे याचे समाधान असून लवकरच याठिकाणी कायम स्वरुपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येईल. याबद्दल केडीएमसी प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे मनापासून आभार

12/04/2025

मध्य रेल्वेवर येणार एक नवीन स्थानक, बदलापूरहून अवघ्या 30 मिनिटांत नवी मुंबई गाठता येणार

बदलापूर आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास लवकरच ३० मिनिटांचा होणार आहे. कासगाव-मोरबे-मानसरोवर या नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. यामुळे बदलापूरकरांना ठाणे बदलून जाण्याची गरज राहणार नाही.

मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी स्थानकांदरम्यान लवकरच ‘पुढील स्टेशन – कासगाव’ अशी घोषणा ऐकू येणार आहे. बदलापूरकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कासगाव-मोरबे-मानसरोवर असा नवा रेल्वेमार्ग उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे बदलापूर आणि नवी मुंबईमधील अंतर केवळ 30 मिनिटांवर येणार आहे. यामुळे नवी मुंबईला अवघ्या ३० मिनिटांत पोहोचणं शक्य होणार आहे.

सध्या बदलापूर शहरातून तसेच मध्य रेल्वेवरुन दररोज हजारो नागरिक नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईला प्रवास करतात. जर त्यांना रेल्वेने प्रवास करायचा असल्यास त्यांना ठाण्यावरून लोकल बदलावी लागते. तसेच रस्तेमार्गाने नवी मुंबई गाठण्यासाठी एनएमएमटीच्या बस उपलब्ध आहेत. मात्र शिळफाटा आणि तळोजा या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे प्रवासाला दीड तासांपर्यंतचा वेळ लागतो. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत पोहोचणे शक्य

या समस्येवर मात करण्यासाठी कासगाव-मोरबे-मानसरोवर या नवीन रेल्वेमार्गाची योजना आखण्यात आली आहे. हा मार्ग सुरु झाल्यास बदलापूरमधील प्रवाशांना नवी मुंबईला अवघ्या ३० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी याबाबत पत्रव्यवहारही केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. रेल्वेने या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

बदलापूरच्या विकासाला चालना

आता लवकरच बदलापूरच्या प्रवाशांना लोकलमध्ये ‘पुढील स्टेशन – कासगाव’ ही घोषणा ऐकायला मिळणार आहे. ज्यामुळे त्यांचा नवी मुंबईचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होणार आहे. या नवीन रेल्वेमार्गामुळे बदलापूरच्या विकासालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.

12/04/2025

कल्याणमध्ये शिक्षकाची सोन्याच्या गुंतवणुकीतून ६६ लाखाची फसवणूक

शिक्षकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

कल्याण पूर्वेतील लोकधारा सह्याद्री भागात राहत असलेल्या एका ५४ वर्षाच्या शिक्षकाची एका महिलेने सोन्याच्या गुंतवणुकीतून १० ते २० टक्के वाढीव नफा मिळवून देते, असे आमिष दाखवून शिक्षकाची ६६ लाख १० हजार रूपयांची गेल्या महिनाभराच्या कालावधीत फसवणूक केली आहे. या शिक्षकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही, असे पोलिसांनी सांगितले. शिक्षकाने दाखल केलेल्या प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की गेल्या महिन्यात या शिक्षकाला एका महिलेकडून फेसबुक मित्र होण्याची विनंती करणारी जुळणी पाठविण्यात आली. या शिक्षकाने होकार दर्शवून मित्र होण्याची विनंती मान्य केली. मित्र झालेल्या महिलेने एक बीअरस्टीर संकेतस्थळाची जुळणी शिक्षकाला पाठविली. आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का, असे प्रश्न केले. आपण सोन्याच्या माध्यमातून गुंतवणूक केली तर आपणास १० ते २० टक्के नफा आपण गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळवून देऊ, असे आमिष दाखविले.

या शिक्षकाच्या विश्वास संपादन केल्यानंतर फसवणूक करणाऱ्या महिलेने आपल्या जवळील दोन मोबाईलच्या माध्यमातून शिक्षकाशी ऑनलाईन संवाद साधण्यास सुरूवात केली. सोन्यामधील गुंतवणुकीसाठी महिलेने शिक्षकाला दिलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम वळती करण्यास सांगितले. अल्पावधीत झटपट अधिकचा परतावा मिळतो म्हणून शिक्षकाने टप्प्याने ७ फेब्रुवारी ते २९ मार्च २०२५ या कालावधीत एकूण ६६ लाख १० हजार रूपये महिलेने दिलेल्या बँक खात्यावर वळते केले.

एवढी मोठी रक्कम गुंतवणूक केल्यावर शिक्षकाने महिलेकडे गुंतवणूक रकमेवरील नफा मागण्यास सुरूवात केली. विविध कारणे देऊन महिलेने वाढीव नफा देण्यास टाळाटाळ सुरू केली. वाढीव नफा मिळत नसल्याने शिक्षकाने आपली गुंतवणुकीची मूळ ६६ लाख १० हजाराची रक्कम परत करण्यासाठी महिलेकडे तगादा लावला. महिला शिक्षकाला दाद देत नव्हती. त्यानंतर महिलेने शिक्षकाच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले आणि फसवणूक करणाऱ्या महिलेने जवळील दोन्ही फोन बंद करून टाकले.

महिलेने आपली सोन्याच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्यावर शिक्षकाने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या महिलेचे तांत्रिक माहितीच्या आधारे मोबाईलच्या माध्यमातून ती सध्या कोठे वास्तव्य करत आहे. कोठे लपून बसली आहे. आणि शिक्षकाने महिलेच्या कोणत्या बँक खात्यावर रक्कम वळती केली आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्याच आठवड्यात डोंबिवलीत पांडुरंगवाडी भागात एका सेवानिवृत्ताची भामट्यांनी लाखो रूपयांची ऑनलाईन माध्यमातून फसवणूक केली आहे. डोंबिवली पश्चिमेत एक पर्यटन कंपनी चालक, तीन खासगी गुंतवणूक सल्लागारांनी गुंतवणूकदारांची कोट्यवधीची रुपयांची फसवणूक केली आहे.

07/04/2025

कल्याण पूर्व कोळसेवाडी विभागाचा वीज पुरवठा मंगळवारी सात तास बंद

कल्याण पूर्व कोळसेवाडी भागातील अनेक नागरिकांचा व्यवसाय वीजेवर अवलंबून आहे.

कल्याण पूर्व भागाला वीज पुरवठा करणाऱ्या पाल गाव हद्दीतील महावितरणच्या उपकेंद्रात अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करायची आहेत. या केंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील लोकधारा फिडरचा वीज पुरवठा बंद राहणार आहे. लोकधारा फिडरवरून कोळसेवाडी परिसराला वीज पुरवठा होतो. त्यामुळे या विभागाचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी (ता.८) सकाळी १० ते संध्याकाळी पाच वेळेत बंद राहणार आहे, असे महावितरणच्या शिळफाटा विभाग साहाय्यक अभियंत्यांनी जाहीर केले आहे.

या कालावधीत कोळसेवाडी परिसराचा वीज पुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. पाल येथील २२० ईएचव्ही येथे देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या उपकेंद्रातून लोकधारा येथील फिडरला वीज पुरवठा केला जातो. तेथून हा वीज पुरवठा कोळसेवाडी विभागाला पुरवठा केला जातो. तापमानाचा पारा ३७ ते ४० अंश दरम्यान फिरत आहे. उन्हाच्या तलखीने नागरिक हैराण आहेत. अनेक नोकरदार अलीकडे घरातून कार्यालयीन काम करतात. त्यांची मंगळवारी हैराणी होणार आहे. अनेक रुग्णालयांचा कारभार वीज पुरवठ्यावर अवलंबून असतो. वीज पुरवठा नसेल तर शस्त्रक्रिया, आवश्यक वैद्यकीय उपचार प्रक्रिया खोळंबून राहतात. त्यामुळे रुग्णालय चालकही वीज पुरवठा बंद राहणार असल्याने् अस्वस्थ आहेत.

कल्याण पूर्व कोळसेवाडी भागातील अनेक नागरिकांचा व्यवसाय वीजेवर अवलंबून आहे. पीठाच्या चक्क्या, पावसाळ्यापूर्वी तिखट मसाला तयार करून देणाऱ्या तिखट कुट्टी मशीन या विजेवर चालतात. अलीकडे सर्वाधिक गर्दी तिखट मसाला कुटून देणाऱ्या कुट्टी मशीन चालकाच्या समोर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या दिसतात. दुकानदार, उपहारगृह, हाॅटेल चालक, खासगी आस्थापना यांना वीज पुरवठा बंदचा फटका बसणार आहे. कोळसेवाडी भागात पालिका, खासगी शाळा आहेत. बहुतांशी शाळांमध्ये परीक्षा सुरू आहेत. वीज पुरवठा बंद राहणार असल्याने वर्ग खोल्यांमधील पंखे बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना घामाघुम होत उत्तरपत्रिका सोडवाव्या लागणार आहेत.

Address

Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमचं कल्याण - Aamcha Kalyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आमचं कल्याण - Aamcha Kalyan:

Share

Category