
05/06/2025
टिटवाळ्यात ‘निसर्गायण’ – पर्यावरण संवर्धनाचा नवउमेद उपक्रम
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टिटवाळ्याजवळील रुंदी या ठिकाणी पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने ‘निसर्गायण प्रकल्प’ राबवला जात आहे. या उपक्रमात १२ एकर भूखंडावर ५,००० झाडांची लागवड करून एक समृद्ध वनराई साकारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
यातील ४ एकर जागेत १,६०० झाडांची लागवड येत्या ८ जून रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेत होणार आहे. उर्वरित झाडे आजूबाजूच्या परिसरात टप्प्याटप्प्याने लावली जातील. संपूर्ण वृक्षारोपण २०२४-२५ या वर्षात पूर्ण करण्याचा मानस असून, लावलेल्या झाडांची निगा राखण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम स्थानिक नागरिक, स्वयंसेवक, शाळा, संस्था व विद्यार्थ्यांच्या सहभागातून पार पाडला जाणार आहे. कार्यक्रमात ‘माती, पाणी आणि जैवविविधता’ या विषयांवर जनजागृती करण्यात येणार असून, पर्यावरण भान जागवण्यासाठी निसर्गभ्रमंतीचे आयोजनही केले गेले आहे.
हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून, हरित क्षेत्र वाढवणे आणि पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक प्रभावी पाऊल आहे.
दोन दशकांहून अधिक कार्यशील संस्था
पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था २५ वर्षांपासून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई परिसरात पर्यावरण शिक्षण व संरक्षणासाठी कार्यरत आहे. पर्यावरणपूरक जीवनशैलीची गरज लक्षात घेऊन संस्थेचा भर सामूहिक सहभागातून पर्यावरण जागृती आणि रक्षण करण्यावर आहे.
कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, निसर्गायणसारखे उपक्रम भविष्यासाठी हरित श्वास घेण्याचे आश्वासन देणारे ठरतील.