07/09/2017
भुईकोट मोहीम किल्ला क्र.- ४
धारुरचा किल्ला.
अर्धा दिवसभर धर्मापूरीच्या इतिहास आणि शिल्प कोंदणात हरवून परत बाहेर पडण कठीण होत पण तरीही 'इथे परत एकदा येऊ' अशी मनाची समजूत घालत आम्ही धर्मापुरी गावाचा निरोप घेतला आणि पुढच्या वाटेला लागलो. धर्मापुरी पासून धारूर साठी थेट बससेवा नाही. धर्मापुरी-अंबेजोगाई-धारूर असा प्रवास करावा लागतो.ठरल्याप्रमाणे आम्ही आधी अंबेजोगाईला आलो आणि तिथून पुढचा प्रवास आम्ही खाजगी(वडाप) वाहनाने केला. अंबेजोगाई-धारूर अंतर ३५ कि.मी आहे. धारूर बसस्थानकातून सरळ रस्ता हा किल्ल्यातच जातो त्यामुळे कुठेही चुकण्याची शक्यता नाही. १० मिनिटे चालल्यावर आपल्याला किल्ला दृष्टीस पडतो.लांबूनच किल्ला बलदंड आहे हे जाणवत आणि असे बरेच विचार मनात आणत आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो.भुईकोट किल्ल्यांना अभेद्य बनवत तो म्हणजे त्याभोवती असलेला खंदक.बहुतेकदा खंदक हा किल्ल्याच्या चारही बाजूला खोदलेला असतो पण धारूर किल्ल्याच्या बाबतीत असे दिसत नाही.किल्ल्यात प्रवेश करतांना उजव्या बाजूला खंदक वजा तलाव आहे ज्याला 'सोलापुरी दिंडी' व 'खारी दिंडी' अशी नावे आहेत. हा तलाव एके ठिकाणी संपतो तिथून पुढे खोल दरी आहे आणि तलावातील पाणी दरीत पडू नये म्हणून बांध घालून पाणी अडवलेले आपल्याला बघायला मिळते. किल्ल्याच्या डाव्या बाजूला ही एक तलाव आहे त्याला 'गोडी दिंडी असे संबोधले जाते पण हा तलाव किल्ल्याच्या आतील बाजूस आहे. आधी 'खंदक'त्यानंतर महाद्वासमोरची 'जिभी' असे अग्निदिव्य पार करून शत्रुसैन्याला किल्ल्यात प्रवेश करावा लागेल आणि त्यातून ही कोणी वाचलच तर पहिली तटबंदी आणि मुख्य तटबंदी च्या मध्ये तो नक्की चिरडला जाईल ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेली आहे. पहिल्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला काटकोनात वळावे लागते तिथून आपल्याला दुसरे प्रवेशद्वार दिसते. दुसऱ्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला जाणारी वाट दोन तटबंदीमधून जाणारी असून तिचा अंत थेट गोडी दिंडी मध्ये होतो अशी अफलातून आणि चक्रावणारी रचना इथे पाहायला मिळते. पाणीटंचाई आणि दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला जरी पुजलेला असला तरीही इथे असलेल्या तलावातील पाणी कधीच पूर्णपणे आटत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. किल्ल्याची रचना जर बघितली तर असे लक्षात येते की किल्ल्याची बांधणी ही पुरेपूर विचारपूर्वक आणि कल्पकतेने केलेली आहे.बालाघाट पर्वतरांगेच्या सुरवातीला ह्याची रचना केलेली आहे त्यामुळे किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण सुद्धा आहे त्यामुळे किल्ला भुईकोट आणि डोंगरी असा मिश्र स्वरूपाचा आहे. धारूर गावातून जर किल्ल्यात प्रवेश केला तर भुईकोट आणि केज मार्गे प्रवेश केला तर डोंगरी. किल्ल्यात बांधकामे चालू आहेत एका खाजगी कंपनीकडे ह्याचे कंत्राट आहे आणि खूप सुंदर असे काम ह्या कंपनीने केलेले आहे आणि करत आहेत. किल्ल्यात बघण्यासाठी बऱ्याच वास्तू आहेत हवामहाल, हमामखाना, दर्गा, घोड्यांच्या पागा, तेल-तुपाचे टाके,बराकी-सैनिकांच्या खोल्या, मस्जिद, रंगमहाल तसेच २८-३० लहान मोठे बुरुज आहेत ज्यात शाह बुरुज, खंदक बुरुज, खंडेराय बुरुज,टांकसाळ बुरुज आहेत. किल्ल्यावर सर्वत्र मुस्लिम राजवटीची छाप दिसते . बहमनी आणि आदिलशाही सत्ता येथे नांदल्याने बऱ्याच वास्तूमध्ये कालांतराने बदल झालेले आहेत. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेनंतर औरंगजेबाच्या आदेशावरून नेतोजी पालकरांना काही काळ इथे बंदिवासात ठेवण्यात आले होते. एकूणच खूप काही घडामोडी इथे घडलेल्या आहेत.किल्ल्यावर ३ ठिकाणी शिलालेख आहेत पहिला शिलालेख हा टांकसाळ बुरुजावर आहे जो जमीनीपासून २० फूट उंचीवर लावलेला आहे जो फारसीमध्ये लिहिलेला आहे. दुसरा शिलालेख किल्ल्याच्या आत असणाऱ्या मशिदीच्या दरवाजावर आहे जो फारसी मध्ये लिहिला आहे आणि तिसरा शिलालेख हा षट्कोनी आकार असलेल्या हत्ती बुरुजावर आहे. हा शिलालेख तीन भाषांमध्ये आहे फारसी, अरबी आणि देवनागरी. हत्ती बुरुजावर शिलालेखाच्या खाली दोन शरभ आणि मध्यभागी हत्ती कोरलेला आहे. किल्ल्यात मशीद ज्या ठिकाणी आहे तिथे एक मनोरा असून तो किल्ल्यात पाण्याची व्यवस्था व्हावी ह्यासाठी बांधण्यात आला होता. किल्ल्याच्या बऱ्याच बुरुजांची रचना ही अर्धगोलाकार आहे आणि त्यात आतपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याचे एक प्रवेशद्वार पश्चिम भागात आहे ज्याला 'डोंगरमुखी प्रवेशद्वार' असेही संबोधले जाते.संपूर्ण किल्ला फिरण्यास ३ तास पुरतात. किल्ल्याची बांधणी ही अभ्यासण्यासारखी असून इथे भुईकोट किल्ल्याच्या बांधणीचे सर्व प्रकार बघायला मिळतात ज्यात जिभी, खंदक, शेरहाजी ह्यांचा समावेश आहे. किल्ला फिरतांना किल्ल्याचा नकाशा आपल्याकडे असेल अशी सोय करावी. दुर्गबांधणीचा उत्कृष्ट नमुना आणि अपरिचित इतिहास आपल्यात दडवून ठेवलेल्या ह्या महादुर्गाला एकदा भेट देऊन नक्की त्याचे सौंदर्य नक्की अनुभवण्यासारखे आहे.
अमोल जामदरे