11/05/2020
पर्यटन मित्र .... आपल्या पर्यटनाचा सोबती.....
महाबळेश्वरातलं स्वर्गतुल्य मिनी काश्मीर
राधेय ऍग्रो रिसॉर्ट.....
'चलते रहेना ही जिंदगी का नूर हे..
पर क्या करे, वक्त की पाबंदी से मजबूर है…
युरोप रशिया तो क्या
अपने लिए कश्मीर भी बहोत दूर है..'
वेळेची बांधीलकी पावलांमध्ये बेड्या बनून राहते आणि मग ती पावलं अडखळतात अर्ध्या वाटेवरच. जायचं असतं खूप दूर; पण… केवळ स्वप्नंच उरता… अशा स्वप्नाळू जीवांसाठी आपल्या मातीत अवतरलेय साक्षात काश्मीर. अहो म्हणजे अगदी आपल्या महाबळेश्वरच्याच सावलीत.. म्हणजे फक्त सोळा किलोमीटर.. ते आहे राधेय ऍग्रो टुरिझम वाटंबे.
राधेय ऍग्रो रिसॉर्ट पार्क. कॉटेज, वूड हाऊस, टेंट हाऊस, गार्डन रेस्टोचे परिपूर्ण विणलेले नंदनवन म्हणावे. कँप फायर, व्हॉलीबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, कबड्डी, क्रिकेट ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट, स्ट्रॉबेरी फार्म, डी.जे., कराओके, रिव्हर कँप, ट्री ब्रीज अशा भरगच्च ओयी आणि ट्रेकिंग, हँगिंग ब्रीजचा थरार.. स्टे इन इग्लु टेंट, आर्मी टेंट, रूम्स, व्हेज नॉनव्हेज फुडस.. बाजूला महाबळेश्वरचा मनमोहन देखावा व लिंगमळा वॉटर फॉल म्हणजे 'आनंदाचे डोही आनंद तरंग'.
महाबळेश्वरला मेढामार्ग जाताना सातारा-मेढा मार्गावरच लागतो केळघर घाट. या घाटात काळ्या कड्याच्या पायथ्याशी पंधरा किलोमीटरवर वसले आहे वाटंबे गाव. म्हणजे वरोशीपासून डाव्या बाजूला वळले की, दोन किलोमीटरवरच आपण पोहोचतो थेट या गावामध्ये. महाबळेश्वरची सावली इथं आहेच; त्यामुळं झाडीही ताहीच दाट, किर्रर्र.. तशीच नागमोडी वळणे आपल्याला मोहित करतात. आंबा, फणसाची आणि मेसाची दाट झाडी कोकणात उतरल्याचा आभास देतात. गावात आले की पुन्हा डाव्या बाजूला एका मिनिटात काश्मीर चढल्यासारखं हे स्वर्गतुल्य ठिकाण येतं. इथली केळीची गर्द बाग पहिली की वसईची आठवण व्हावी. आंबा, फणसाने कोकणाचा सुगंध उतरावा आणि सुरू, सिल्व्हर, अशोकाची झाडे पाहताना आपण जणू काश्मीरच्या भूमीवरच दाखल झालो आहोत, असा आनंद मनातून पाझरावा. आजूबाजूला हिरव्याकंच डोंगरांची वर्दळच उभी जणू. सह्याद्रीचं हे विलक्षण देखणं रूप पाहताना भान हरपून जायला होतं अगदी. पश्चिमेकडे लिंगमळा धबधबा कोसळतोय. पायाखालून वेण्या नदी वाहतोय. यासारखी श्रीमंती काय असेल अजून…? अहो, विधाता सहस्त्र हस्ते हे वैभव उधळतोय. फक्त तो आस्वाद घेण्यासाठी आपण तत्पर असायला हवं. इथले वुडन हाऊस नाजूक कलाबुत्तीचा सर्वोत्तम आविष्कार आहेत. कोकणचं सुख आपल्या पदरात ओतणारी जांभ्या दगडाची घरंही इथं आहेत.
इथल्या टेंटमध्ये राहण्याचा आनंदही वेगळा आणि हो, याहीपेक्षा पाहुणे म्हणून येणार असाल, तर राधेय ऍग्रो त्यासाठीही तत्पर आहे. चक्क यजमानांच्या घरातच राहा, कसलाही त्रास नाही.
अंघोळ करायची असेल तर विहीर शेजारी आहेच. मस्त गार पाण्याचा आनंद इथं घेता येईल. अंगावर शिरशिरी फुलते. इथं मस्त पोहू शकता आपण. गरमागरम हवे असेल तर टेंटमध्ये सोय आहेच. गरम पाणी आणि सुंदर बाथरूम. इथून बाहेर पडलात तर गार वाऱ्याचे झोत आपल्या स्वर्गतास सज्ज. जणू जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा मखमली स्पर्श या वाऱ्यातूनही जाणवतो. तनामनाला शांत करून जातो. जेवण झाल्यानंतर मुलांना इथे खेळू द्या मस्त. इथं क्रीडांगण आहे. क्रिकेट, व्हॉलीबॉल, टेनिस, बॅडमिंटन हवं ते खेळावं सायंकाळी झुलत्या पुलावर चालण्याचा आनंद घ्यावा. हे चालणं म्हणजेसुद्धा एक थ्रील असतं. रात्रीचा गारवा अलवार उतरताना इथं शेकोटीची आनंद लुटावा. या कँप फायरसोबत डी.जे. नाईट किंवा खास आपल्यासाठी कराओके सिंगिंग. मनोरंजनाची ही झिंग चढत्या रात्रीची रंगत वाढविते. बेधुंद होऊन इथं नाचावं, गावं, त्यासाठी फणसाच्या झाडांखाली सुंदर स्टेज आहे. अहं.. स्टेज म्हणावं की आपल्यातील सुप्तकलागुणांना मिळालेलं व्यासपीठ? ते आपणच ठरवावं. स्वर्गसुखाची महाद्वार इथं आपल्यासाठी खोलली जातात म्हणा ना.
अंगाला न झोंबणारी काळ्या कड्याची उबदार थंडी आपल्याला जणू मायेच्या दुलईत लपेटून घेते. अशावेळी सकाळच्या गर्द थंडी6इथला गवती चहा अमृतासारखा लागतो. इथे आपणच आपले जेवण बनविणार असाल तर साहित्य घेऊन या चुलीची व्यवस्था करून दिली जाईल. फक्त रस्सा बनविणार असाल तर भाकरी-भाताची सोय आहेच आणि सर्वच हवे असेल, तर तेही मिळतं इथं अगदी रुचकर.. जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुम्हाला जेवण करायचे असेल तर इथं तुम्ही अगोदर कल्पना द्यावी लागते.. तुम्हाला बाजरी, ज्वारी, नाचणी, तांदूळ यांची चक्क लाकूड फाट्याच्या चुलीवर भाजलेली आणि विस्तवावर शेकवलेली, टर्र फुगलेली पापडी ओली भाकरी मिळते. ही भाकरी खायची कशासोबत? इथल्या झऱ्यावरच्या पाण्यात शिजवलेली, भरडलेल्या काळ्या घेवड्याची आमटी, चटकदार उडदाचे घुटे, वाळलेला वाटाणा, मुरमावर उगविलेला हिरवा कोवळा पावटा याच्या कालवणाबरोबर ही भाकरी खाल्लीत तर, याची चव जिभेवर कायमच रेंगाळत राहील. आणि याहीपेक्षा वेगळं खायचं असल्यास पुरणपोळी, सोबतीला मराठमोळी गुळवणी खायची स्पर्धा लावायला भाग पाडले. तुम्ही मांसाहारी असाल, तर पिकलेल्या तवशाचे (काकडीचे) भोपळ्याचे किंवा कोहळ्याचे वडे, सोबत तांदळापासून बनविलेले केळीच्या पानावरचे घावने व सोबत गावरान कोंबडी किंवा कोंबड्याचा रस्सा.. कसा वाटतो बेत? अंगातली थंडी कुठल्या कुठे पळून जाईल. घाटावरची, घरी बनवलेली चटणी म्हणजे एकदम कडक माल. जिभेवरून भेट काळजात चर्र उतरेल. आणखी मेनू आहेच. तळलेला कांद्यातील बोंबील, सकी सुकटवा खारा मासा मागवा. जिभेला गुदगुदल्या करतच हे मनाच्या तळाशी जाऊन घट्ट रुतून बसेल. साधा बेत आखायचा असेल तर पिठलं-भाकरी व कांदा घेऊन विहिरीकाठी जा आणि जेवणाचा आनंद लुटा. आयुष्यात स्वर्गसुख म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असू शकतं?
मग येताय ना मिनी काश्मीरमध्ये, आनंदाचे सोहळे लुटायला…?
-मोहन भणगे, वाटंबे(सातारा)