01/02/2020
#समरभूमी उंबरखिंड🚩
खालापूर तालुक्यात खोपोली-पाली रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत, डोंगरराशीत व नदीकाठी चावणी व उंबर गावाजवळ 'उंबरखिंड' आहे. अनेक शिवप्रेमी व अभ्यासू पर्यटक उंबरखिंडीला भेट देण्यास येतात. 2 फेब्रुवारी 1661 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या एक हजार सैन्यासह कारतलब खानच्या वीस हजार फौजेचा उंबरखिंड या ठिकाणी पराभव केला होता. पिरडा जिंकल्यावर शाहिस्तेखानाने कारतलब खानाला कोकणवर स्वारी करायला पाठवले. खान कोकण काबीज करण्यासाठी आंबेनाळ उंबरखिंड मार्गे उतरणार, हे महाराजांना समजताच त्यांनी स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पालकरांना पुढे जाऊन छावणी टाकण्यास सांगितले. स्वराज्याचे सैन्य उंबरखिंडीच्या मार्गात दबा धरून बसले होते. खानाने कुरवंडा घाटातून उतरून राजांच्या सैन्यावर हल्ला करण्याची योजना ठरली. खान कुरवंडा घाटातून उतरणार ही हल्ल्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट होती. कुरवंडा घाटातून अंदाजे दोन मैलांवर चावनी नावाचे गाव आहे. इथून पुढचा मार्ग अत्यंत उताराचा आणि अगदी चिंचोळा. म्हणजे एका वेळी एकच माणूस जाईल असा मार्ग. चावनीपुढे आल्यावर नदीच्या वळणापाशी चढाव चढून अर्धा-पाऊण मैलावर उंबरे गाव आहे. चावनी ते उंबरे गावामध्ये असलेली मैलभर लांबीची दरी खिंडीसारखी आहे म्हणून तिला उंबरखिंड म्हणतात.
खानाचे सैन्य उंबरखिंडीत उतरले ना उतरले तोच छत्रपती शिवाजी महाराजांनी खानाच्या सैन्यावर हल्ला चढवला. एका बाजूने नेताजी पालकर, दुसऱ्या बाजूने स्वतः शिवाजी महाराज असे कोंडीत पकडून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे खानाच्या सैन्याची दाणादाण उडाली. खानास माघार घ्यावी लागली. त्यानंतर खानाच्या सैन्याची शस्त्रे, उत्तम वस्त्रे, डेरे-तंबू, दागिने, घोडे, बैल महाराज्यांच्या सैन्याने मिळविले. या लढाईची वैशिष्ट्ये अशी की, कमी सैन्याने मोठ्या शत्रूचा गनिमी काव्याने पराभव केला. शिवाजी महाराजांनी स्वतः एकूण 27 महत्त्वपूर्ण लढायांमध्ये भाग घेतला होता. त्यापैकी ही एक लढाई आहे. दरवर्षी 2 फेब्रुवारीला येथे विजयदिन साजरा केला जातो.