02/10/2024
भारतीय स्वातंत्र्याचे अग्रदूत तसेच सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वावर ज्यांचे समग्र जीवन आधारित होते अशा परम पूज्य बापूंना जयंतीनिम्मित विनम्र अभिवादन🌸🙏🌸
प्रिय बापू, तुम्हाला माहित नसेल तूम्ही सांगितलेला सत्य आणि अहिंसेचा मार्ग आम्हाला खूप आवडतो मात्र तो केवळ लगे रहो मुन्नाभाई सारख्या चित्रपटात. तुमचा तो मार्ग आम्ही आवडीने बघतो त्याची चर्चा करतो थोड्या वेळासाठी का होईना प्रचंड प्रेरीत होतो आणि तो चित्रपट संपला की, दैनंदिन जीवनात हिंसेलाच खतपाणी घालतो, मनापासून आपलं मानतो. हल्ली काहीही झालं की, लगेच हमरीतुमरीला येणं हा आमच्या सवयीचा भाग झाला आहे. एखाद्याला मारायला अंगावर जाणं ह्यातच आमचा खरा पुरुषार्थ सामावला आहे असा आमचा समज झाला आहे.
एखाद्या घटनेमागचे सत्य जाणून घेवून काहीतरी बोलावं त्याआधारावर काहीतरी कृती करावी एवढा संयम आमच्यात राहिला नाही हो बापू. प्रथमदर्शनी ब्रेकिंग न्युज म्हणून व्हायरल झालेल्या बातम्या क्षणभरात आम्ही सर्वदूर पोचवतो मात्र नंतर त्याच बातम्या मागचं बाहेर आलेलं सत्य लोकांपर्यंत पोचवण्याऐवजी ते सत्य कसं सत्य नाही हे दाखवण्यासाठी आम्ही नाही तेवढा आटापिटा करतो, त्यासाठी कोणत्याही थराला जाणं आम्ही खूप प्रयत्नांती शिकलोय. आहो आम्हाला कशाची कसली भीती, नैतिकता, कसली तत्व, आमच्या व्यवहारात कसली पारदर्शकता, जिथं संधी भेटेल तिथं छापायचं, एखाद्याला ठगायचं हाच आमचा एककलमी कार्यक्रम. स्वतः प्यायचं, दुसऱ्यांना पाजायचं ह्यातून आम्हाला आनंद मिळतो. स्वतः जुगार खेळणार आणि इतरांना अडचणीत आणणार, ना आम्हाला ज्येष्ठ मंडळीबाबत आदर राहिला, ना गोरगरिबांबाबत आस्था, संविधान फक्त नावाला ते वाचण्यासाठी, समजुन घेण्यासाठी आम्हाला कुठं आहे वेळ.
तासनतास फालतू रिल्स बघत बसणं हा आमचा दिनक्रम झालाय, ह्यातून आम्हाला कुठं वेळ मिळतो, चांगली पुस्तकं वाचायला. असं वाचून कोणी किती झेंडे गाढलेत हाच आमचा आविर्भाव असतो. आहो आम्ही उत्तरोत्तर सहिष्णू, संवेदनशील होण्याऐवजी खूप निगरगट्ट होत चाललोय. बापू, तुम्हाला शिव्या घालण्यात, तुमची बदनामी करण्यात आम्ही कुठंच कधीच कमी पडत नाही कारण हेच आमचं कर्तव्य आहे. तुमच्याबद्दल वाचावं, जाणून घ्यावं ह्यात आम्हाला नाही इंटरेस्ट. व्हॉट्सअँप, फेसबुकवर तुमच्याबद्दल जे काही आम्हाला वाचायला भेटतं तेच कधी वाचता तर कधी न वाचता पुढं फॉरवर्ड केलं की झालं आमचं काम.
उतरोत्तर माणूस सत्यापासून दूर आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून हिंसक बनत चालला आहे. हिंसेचा मार्ग कधीच शाश्वत नव्हता आणि पुढेही नसणार. हे तथागत गौतम बुध्दांनी फार पूर्वी सांगुन ठेवले आहे.