05/08/2023
हरिश्चंद्रगड इथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनिमित्त...
मित्र जमतात, बेत ठरतो, सर्वजण आपापल्या व्यापातून वेळ काढतो आणि मग एक दिवस ठरवून आपण प्रवासासाठी बाहेर पडतो.
धार्मिक पर्यटन, थंड हवेची ठिकाणे, समुद्रकिनारे, शहराच्या आसपासची गावं इत्यादी जागा निवडून प्रवास करताना हे सर्व उत्तम असतं.
परंतु, गड दुर्ग, डोंगर रांगा, रस्ता, वस्तीपासून दूर असलेल्या जागा अश्या एखाद्या भटकंतीसाठी निवडताना पूर्णपणे वेगळा विचार करायचा असतो, हे कोणाच्याच का लक्षात येत नाही??
इथली दुर्गमता, इथल्या फसव्या वाटा, अगदी अनोळखी असणारी रचना, बऱ्याच ठिकाणी नसणारे नेटवर्क अश्या अनेक बाबी आहेत यात. या सर्वांबद्दल विस्तृत चर्चा इथे घडलेली आणि आणि घडत राहील. परंतु, आपण बाहेर पडताना जर दुर्गम जागी जाणार असू तर आपल्याला वेगळा विचार करायला हवा.
अगदी कुठेही जाताना आपण सर्वचजण आर्थिक बचत हा विचार करतो.. आपले पैसे कसे वाचतील हे पाहताना सर्वात आधी पैसे वाचवले जातात ते "आपलं आपण जाऊ" म्हणून.. नको वाटाड्या, नको कोणी आयोजक किंवा संयोजक, नको व्यावसायिक संस्था...
या सगळ्या गोष्टीत पैसे खर्च करणं हे कसं विनाकारण आहे आणि हे सर्वच लोक कसे लुटतात, हा विचार केला जातो.
बाकी सगळं येतं ... अगदी दुर्गम भागात ज्या गोष्टी घेऊन जाऊ नयेत अश्या व्यसनांना या यादीत स्थान असतं... परंतु, वाटाड्या, संस्था इत्यादींवर खर्च नको म्हणून आपण आपली सुरक्षितता आणि जीवाचे महत्त्वच बाजूला टाकलेले असते, हे कोणाच्याच ध्यानी येत नसावं का??
का घेतात पैसे हे लोक? वाटाड्या आपला दिवस मोडत असतो तुमच्यासाठी... व्यावसायिक संस्था, आयोजक हे प्रशिक्षित, नोंदणीकृत असतात, ते तुमच्या जीवाची, सुरक्षेची जबाबदारी घेत असतात... त्याच्या बदल्यात त्यांना होणारा नफा आपल्या सुरक्षेशी जोडून पाहा... किती असतो हा नफा?? आपल्या जिवापेक्षा तर खूपच कमी...
अहो, शासन एखाद्या अपघाती मृत्युसाठी नातेवाइकांना जी रक्कम देते ती असते २-५ लाख रुपये... ती रक्कम ध्यानी धरुन सांगा... ती सुद्धा आपल्या जीवासमोर खरं तर नगण्यच..
आणि आपण २००-५०० वाचवण्यासाठी संपूर्ण जीव धोक्यात घालतोय.
आपण जातोय ती जागा किती दुर्गम, योग्य वाटा कुठल्या, माघारी कुठं फिरायचे, कधी निघायचे, कधी यायचे... अमुक वेळच का? अमुक वाट, अमुक जागा, अमुक पद्धतीनेच का... या सर्वांसाठी वाटाडे, आयोजक यांची वर्षे गेलीत हो...
त्यासमोर तुमच्याकडून त्यांना मिळणारा नफा काहीच नसतो..
माझं म्हणणं असं अजिबात नाहीये की आयोजकांसोबत, वाटाड्या सोबत अपघात होणारच नाही. परंतु, त्यांच्या सोबत असताना ही शक्यता १ टक्क्यांहून कमी होते.
म्हणूनच आयोजक सुद्धा निवडून पहावे लागतात..त्यांची नोंदणी झाली आहे का? प्रशिक्षित आहेत का? कधीपासून काम करतात? आपण जिथे जातोय, तिथं ते किती वेळा गेले आहेत? सोबतीला किती जण येणार आहेत. आवश्यक सुरक्षा उपकरणे आहेत का? अश्या अनेक गोष्टी येतात त्यात सुद्धा ... त्यावर सविस्तर बोलता येईल..
परंतु, एक विनंती...
आपापले जाऊन TTMM करु वगैरे म्हणत स्वतःच्या सुरक्षेशी किती खेळायचे याचा विचार करा.. कारण, असे अपघात झाल्यावर त्याला जबाबदार नसलेल्या आयोजकांवर सर्वात जास्त परिणाम होतो.. अनेक ठिकाणं बंद झाल्यामुळे आयोजक, जे या व्यवसायावर अवलंबून आहेत, त्यांचे प्रचंड नुकसान होते.
(याला याच्या धंद्याचे पडले आहे असे वाटणारे लोकही इथं येतील कमेंट करायला.. करा... परंतु, आयोजकांची गरज काय? ते सांगण्याचा हा एक प्रयत्न... बाकी देशात लोकशाही आहेच.. )