24/03/2019
कोण ठरवणार लोकसभेचा निकाल ?
हे नीट वाचा आणि मग आपल मत कुणाला हे ठरवा.
निवडणुकीच्या राजकारणाचा आणि गणितांचा विचार करताना जे पक्षाचे किंवा एखाद्या नेत्याला निष्ठा वाहिलेले कार्यकर्ते असतात त्यांची मत आणि कल स्वच्छ असतो.
जे एखाद्या पक्षाच्या विचारसरणीचे समर्थक असतात मात्र सक्रीय कार्यकर्ते नसतात त्यांच्याही मतांमध्ये फारसा बदल होत नाही.
मात्र मतदानाच्या २-५ टक्के लोकांच्या बदलणाऱ्या मतांवर निवडणुकीचे निकाल लागतात.
तिरंगी-चौरंगी लढती असतील तर थोड्याफार जागा इकडे तिकडे होतात.
जेव्हा हे काठावर असणारे २-५ टक्के लोक निवडणुकीत एखाद्या पक्षाला निवडून देण्यासाठी किंवा सत्तेतून हाकलून लावायला म्हणून मतदानाला बाहेर पडतात तेव्हा भल्या भल्या पंडितांचे अंदाज चुकतात.
२०१४ च्या निवडणुकीपूर्वी अण्णांचं आंदोलन होऊन गेलेलं होत.त्यापूर्वीच मोदींनी राष्ट्रीय राजकारणात स्थान बनवायला हालचाली सुरु केलेल्या होत्या.
गुजरात मॉडेल नावाच एक विकासाच मॉडेल आणि त्याच मिथक निर्माण झालेलं होत.
मग सोशल मिडिया, फोटोशॉप, इमेज बिल्डींग, मागच्या सरकारच्या दहा वर्षाच्या सत्तेमुळे सत्ताविरोधी भावना ह्यांचा एकत्रित मेळ जुळून आला.
नरसिंहराव-मनमोहनसिंग जोडीने जो अर्थव्यवस्था वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयोग सुरु केलेला होता त्याची फळ चाखलेली पिढी आणि त्यांची पुढली पिढी अजून काहीतरी पाहिजे ह्या अपेक्षेत होती.
अशावेळी मोदींनी गुजरात मॉडेल च्या मिथकातून स्वतःची उद्योगस्नेही प्रतिमा निर्माण केलेली होती ती प्रतिमा लोकांना भावली.
सोबतीला मोदींनी दिलेली आश्वासन, आधीच्या तीन वर्षाच्या दुष्काळात होरपळून निघालेला आणि मोदींच्या हमीभावाच्या घोषणांनी हुरळून गेलेला शेतकरी वर्ग , आर्थिक पातळीवर काहीतरी भव्यदिव्य घडेल अशी आशा असलेला मध्यमवर्ग मोदींना निवडून द्यायला बाहेर पडला.
नंतरच्या पाच वर्षात आर्थिक पातळीवर काय काय झाल, नोटाबंदी-जीएसटी , रोजगाराचे वादे आणि दावे, शेतकरी आत्महत्या आणि ऑनलाइन यंत्रणांच खूळ हे सगळ लोकांनी बघितल.
ह्या २-५ टक्के कुंपणावर असलेल्या अनेक लोकांपैकी माझ्या भवताली, माहितीतली, ओळखीतली अनेक लोक होती जी २०१४ ला मोदींचे समर्थन करत होती.
अगदी नोटाबंदी होईपर्यंत ह्या लोकांचा “ मोदी काहीतरी चांगल करतील “ असा विश्वास होता.
नंतर मात्र जेव्हा अपेक्षित आर्थिक बदल मागे पडून गाय-बैल-हिंदू-मुस्लीम आणि सगळा थिल्लरपणा टिपेला गेला तसा हा वर्ग निराश झाला.
सरकारला समजलच नाही कि बहुसंख्य काठावरचा मतदार आपल्यामागे विकासासाठी उभा आहे , कडव्या हिंदुत्वासाठी नाही.
काहींनी जाहीरपणे कबुली दिली , काहींनी अप्रत्यक्षपणे.
पाच वर्षात पुलाखालून बरच पाणी गेलेलं आहे.
पूर्वी लोक ट्रोल नामक झुंडीला घाबरायचे, आता हे ट्रोल विनोदाचा विषय झालेले आहेत.
सोशल मिडीयाच हत्यार प्रभावीपणे वापरायला विरोधातली मंडळी शिकलीत आणि त्याहीपेक्षा सामान्य नेटीझन्स सरकारला जास्त त्रासदायक झालेत .
पाच वर्षापूर्वी तुम्ही काय बोललात ह्याचे स्क्रीनशॉट तोंडावर फेकून " बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल " अशी अवस्था समाज माध्यमात झालेली आहे.
२०१९ च्या निवडणुकीसाठी , आधीच्या सरकारने काय केलेलं, आम्हाला एक संधी द्या, गुजरात मॉडेल च मिथक आणि मोदींची उद्योगस्नेही प्रतिमा ह्या सगळ्यांचा सरप्राईज इलेमेंट होता तो आटोपलेला आहे.
मोदी नेमके कुणाचे स्नेही आहेत हे उर्वरित लोकांनाच नव्हे तर भारतातल्या उद्योजकांना कळून चुकलेल आहे.
अंधभक्त डोळ्यावर झापड बांधून बसलेले असले तरी सांख्यिकी तपशिलात केलेले फेरबदल , नोटाबंदी बद्दल रिझर्व्ह बँकेची कबुली , नोटाबंदी नंतर घटलेले रोजगार, ठप्प झालेली नवीन रोजगार निर्मिती , उद्योग व्यवसायात आलेली मरगळ हे लोकांना रोज जाणवणारे घटक आहेत.लहान मोठ्या उद्योजक व्यवसायिकांना ह्याची थेट झळ पोहोचलेली आहे.
शेतकऱ्यांचा झालेला भ्रमनिरास देशभरात गेल्या पाच वर्षात वेळोवेळी झालेली आंदोलन आणि संप अधोरेखित करतात.
अशावेळी मोदी मत कशावर मागणार ?
नोटाबंदी-जीएसटी यशस्वी ठरला आहे तर त्यावर मत का मागत नाहीत ?
सरकारच्या महसुलाची अवस्था टीसीएस वर लावलेला जीएसटी आणि त्याला परत घेण्याची आलेली नामुष्की हे ओरडून सांगत.
मग आपल्या कारभारावर पांघरून घालायला आता राम मंदिराचा उपयोग होत नाही ना भारत पाकिस्तान ची लढाई कामाला येते ना हिंदू मुस्लीम कार्ड कामाला येतय.
म्हणून “ शेर अकेला आता है “ अस म्हणता म्हणता अनेक राज्यात स्थानिक पक्षांना चुचकारून कधी इडी आणि सीबीआय ची भीती घालून एनडीए मध्ये दावणीला बांधलेलं आहे , त्यांना लोकसभेला जागा दिल्यात किंवा कॉंग्रेस आघाडीत न जाता वेगळी चूल मांडून विरोधी मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न केलाय.
डोळे दिपवणारा विकास झाला असता आणि सगळ काही आलबेल असत तर खरोखर शेर अकेला आला असता आणि साध्या सर्वसामान्य एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट देऊन खासदार करून सत्तेत आला असता.
ती खात्री उरली नसल्याने हे दुसऱ्या पक्षातले दत्तक उमेदवार बोकांडी घेण्याची घाई हेच पराभूत मानसिकता झाल्याच लक्षण आहे.
आपल्या कामगिरीवर मत मागता येत नाही, भावनिक मुद्दे चालत नाहीत म्हणून निदान तिरंगी चौरंगी लढती घडवून तरी काहीतरी पदरात पडेल ह्यासाठी खेळ सुरु आहे.
आता हा आर्थिक आघाडीवर आलेल्या अपयशाने भ्रमनिरास झालेला २-५ टक्के वर्ग मतदानाला बाहेर पडून ह्यांना घालवायला मतदान यंत्रावर बटण दाबायला बाहेर पडला कि कार्यभार आटोपला.
आपल्याला २०१४ साली आपल्या राहणीमानात, आर्थिक स्थितीत, रोजगारात, देशाच्या एकूण स्थितीत काय बदल होतील ह्याची दिलेली आश्वासन आणि त्यांची आजची अवस्था एवढच बघा आणि मताचा हक्क बजवा.
बाकी धार्मिक अस्मिता-पुतळे-गाई-बैल हे सगळ्या भरल्या पोटी मारायच्या गप्पा आहेत, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या माणसाचा धर्म भूक आणि देव भाकरी एवढच सत्य.
#लोकसभा_२०१९