12/05/2026
गेल्या महिन्यात केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील सह्याद्रीतल्या एका गावात जाण्याचा योग आला. तिथे कोकणातल्या देवराई राखणदार संस्कृतीचं आणखी खोल आणि जिवंत रूप अनुभवायला मिळालं.
ही भूमी म्हणजे फक्त जंगल नाही, तर माणसाला जगण्यासाठी लागणारं पाणी निर्माण करणारी, हजारो प्रकारच्या बिया आपल्या कुशीत रुजवणारी आई माऊली आहे. कोकणात जिचं रूप ‘सातेरी’ म्हणून जपलं गेलं, तीच देवी केरळ आणि कर्नाटकात वारुळात, नागाच्या रूपात, जंगलाच्या रूपात पूजली जाते.
तिथल्या लोकांसाठी जंगल म्हणजे resource नाही तर जिवंत देवस्थान आहे. त्या प्राचीन जंगलांना ते “कावू” म्हणतात, Sacred Groves. जिथे शेकडो वर्षे कुऱ्हाड गेली नाही, जिथे माती अजूनही जिवंत आहे, जिथे झऱ्यांचा जन्म होतो, जिथे पक्षी, साप, वाघ, किटक आणि माणूस एका अदृश्य कराराने एकत्र राहतात.
त्या कावूंमध्ये ऐकायला मिळणाऱ्या नागदेवता, वाघरक्षक, देवचार यांसारख्या लोककथा केवळ अंधश्रद्धा नाहीत, तर जंगल वाचवण्यासाठी समाजाने तयार केलेली सांस्कृतिक सुरक्षा व्यवस्था होती असं जाणवतं. आज विज्ञान सांगतं की Sacred Groves मुळे पाणी टिकतं, जैवविविधता टिकते, हवामान संतुलित राहतं. आपल्या पूर्वजांनी हे हजारो वर्षांपूर्वी समजून घेतलं होतं.
कोकणात जसं “देवराईत काही तोडायचं नाही” ही भावना होती, तशीच केरळमध्ये “कावू” बद्दल आहे. म्हणूनच अजूनही तिथे काही ठिकाणी हजारो वर्षांची जैवविविधता शिल्लक आहे.
राखणदार चळवळीसाठी हे समजून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं. कारण अखंड भारताच्या जल-जंगल-जमिनीला पूजणाऱ्या संस्कृतीची मुळं ही अशाच लोकांमध्ये आहेत, आदिवासी, मच्छीमार, ग्रामीण समाज आणि जंगलाशी नातं न तोडणारे लोक.
केरळची लोककथा, आदिवासी संस्कृती, मच्छीमारांचं जीवन, खाद्यसंस्कृती, हे सगळं कोकण पट्टी समजून घेण्यासाठी एक मोठं विद्यापीठ आहे. सह्याद्री एकच आहे… मातीचा रंग बदलतो, भाषा बदलते, पण निसर्गाशी नातं जोडण्याची संस्कृती सारखीच वाटते.
आणि या सगळ्यात मध्ये एखाद्या कौलारू छोट्याशा घरातल्या toddy shop मध्ये बसून ताजी ताडी पित, गरम अप्पम खात, बाहेर पडणारा पाऊस आणि नारळांच्या झावळ्या बघत अनुभवलेलं सुशेगाद केरळ अजून जवळचं वाटतं. त्या साध्या जगण्यातही निसर्गाशी जोडलेली एक शांत लय जाणवते.
आज विकासाच्या नावाखाली जंगल, डोंगर, पाणी आणि गावं नष्ट होत असताना या देवराई राखणदार संस्कृतीकडून पुन्हा शिकण्याची गरज आहे. कारण जंगल वाचवणं म्हणजे फक्त झाडं वाचवणं नाही, तर भविष्यात माणूस म्हणून जगण्याची शक्यता वाचवणं आहे.